'कार्यकर्ते घडविण्यास ‘सकाळ’ने पुढाकार घ्यावा'

पुणे -राजकारणात परिपक्व कार्यकर्त्यांची कमी आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी विचारांची योग्य बैठक, सुसंस्कृत, ध्येयनिष्ठ आणि सामाजिक बांधीलकी मानणारे कार्यकर्ते घडविण्यासाठी ‘सकाळ’ने पुढाकार घ्यावा. कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी व्यासपीठ निर्माण करावे, अशी अपेक्षा पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी व्यक्त केली. 

‘सकाळ साप्ताहिक’च्या २९व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, मुख्य संपादक श्रीराम पवार, संपादक मल्हार अरणकल्ले व पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. ‘सकाळ साप्ताहिक’च्या ताज्या अंकाचे प्रकाशन या वेळी बापट यांच्या हस्ते झाले. 
आपल्या भाषणात बापट यांनी ‘सकाळ’च्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘प्रयोगशीलता हे ‘सकाळ’ समूहाचे वैशिष्ट्य आहे. समाजाबरोबर जाणारे, सर्व घटकांना सामावून घेणारे आणि सर्वसामान्यांचा विश्‍वास संपादन करणारे वृत्तपत्र असा ‘सकाळ’चा लौकिक आहे. केवळ एका वाचकाशी नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाशी नाते जोडण्याचे काम वृत्तपत्र म्हणून ‘सकाळ’ अव्याहतपणे करीत आहे. ‘तनिष्का’च्या माध्यमातून महिलांच्या क्षमतेला चालना देण्याच काम ‘सकाळ’ने केले आहे. सरपंच परिषद भरवून ‘स्मार्ट सिटी’सारख्या एका चांगल्या योजनेची संकल्पना समाजापर्यंत पोचविण्याचे कामदेखील मोठ्या हिरिरीने सुरू आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना कामाची प्रेरणा ‘सकाळ’कडूनच मिळाली आहे.’’
चांगले लोक राजकारणात येण्यास उत्सुक नाहीत. ही परिस्थिती समाजासाठी योग्य नाही. याची दखल घेऊन राजकीय कार्यकर्त्यांसाठी एका व्यासपीठाची नितांत गरज असल्याचे बापट यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘कार्यकर्ता कोणत्याही राजकीय विचाराचा असला, तरी त्याचे योग्य प्रशिक्षण होण्याची नितांत गरज आहे. कोणत्याही राजकीय पक्षात कार्यकर्त्याचे योग्यरीत्या प्रशिक्षण सध्या होत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी इतर उपक्रमांप्रमाणे ‘सकाळ’ने कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षणाची व्यवस्था निर्माण करावी. राजकारणात येणाऱ्या कार्यकर्त्याचा हेतू शुद्ध हवा, त्याला सामाजिक प्रश्‍नांची जाणीव असायला हवी कार्यकर्ता कोणत्याही विचाराचा असो, त्याच्याकडे विचाराची स्पष्टता आणि समाजाप्रती बांधीलकीची भावना रुजविण्याचे काम या माध्यमातून व्हायला हवे.’’

मल्हार अरणकल्ले यांनी प्रास्ताविक भाषणात ‘सकाळ’च्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘उच्च शिक्षणातील ‘एज्युकॉन’ परिषद असो वा ‘तनिष्कां’च्या माध्यमातून विविध समाजपयोगी उपक्रमांचे आयोजन, ‘सकाळ’ नेहमी वाचकांबरोबर राहिला आहे. ‘स्मार्ट सिटी’सारख्या योजनेत पुण्याचा समावेश होण्यासाठी ‘सकाळ’ने घेतलेला पुढाकार, राज्यातील शेतकऱ्यांसाठी दरवर्षी घेण्यात येणारी सरपंच परिषद अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून ‘सकाळ’ने नेहमी वाचकांशी बांधीलकी जपली आहे.’’ ‘सकाळ साप्ताहिक’च्या सहसंपादक ऋता बावडेकर यांनी सूत्रसंचालन केले.

पावसातही लक्षणीय प्रतिसाद
दुपारपासून पावसाची रिपरिप सुरू होती. कार्यक्रमाच्या वेळीदेखील पाऊस सुरूच होता. तरीही अनेकजण पावसात भिजत कार्यक्रमस्थळी पोचले होते. संपूर्ण ‘बालगंधर्व’ भरून गेले होते. तरुण-तरुणींची संख्या यात लक्षणीय होती.